Saturday 11 September 2010

॥ काव्यशास्त्रविनोदा: - ३ ॥

मागील भागात म्हटल्याप्रमाणे या भागात आपण 'अन्योक्ति' आणि 'प्रहेलिका' हे काव्यप्रकार पाहू.

अन्योक्ति मराठीतही वापरली जाते. संस्कृत काव्यशास्त्रविनोदात असलेली अन्योक्तिची उदाहरणे एक निराळाच आनंद देऊन जातात. मूळ तत्व तेच. 'अन्य' वस्तू/गोष्टीच्या उक्तीने आपल्याला केलेला उपदेश किंवा 'लेकी बोले सुने लागे' असं वर्णन. प्रत्यक्ष मनुष्याचा उल्लेखही न करता, मनुष्यस्वभावाचे समर्पक विवचन करणार्‍या सुभाषितांचा रसास्वाद लुटणे किती आनंददायी आहे. काही सुभाषितांत तर केवळ चार चरणात आयुष्याचे तत्वज्ञान सामावलेले असते. खरंच हा सुभाषितांचा साठा म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. चला तर अशा काही 'अन्योक्ति' पाहूया.

अपसर मधुकर दूरं परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे।
इह न हि मधुलवलाभो भवति परं धूलिधूसरं वदनम्॥

येथे भुंगा आणि केतकीच्या फुलाच्या उदाहरणातून मनुष्यस्वभावाचं चित्रण केलेलं आहे. आधी सुभाषिताची समजण्यास सोपी अशी सुटसुटीत मांडणी करून भाषांतर करून घेऊ. 'मधुकर, दूरं अपसर, परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे' - हे भुंग्या, पुष्कळ सुगंध असणार्‍या केतकीच्या फुलापासून दूर जा. (केतकीच्या फुलात पुष्कळ सुगंध असला तरी त्यापासून दूर जा) का? तर 'इह न हि मधुलवलाभः' - खरोखर इथे मध मिळायचा नाही, 'भवति परं धूलिधूसरं वदनम्' - पण (तुझे) तोंड मात्र धुळीने माखून जाईल.
अर्थात केतकी इतकी सुगंधी की एखाद्याला भुरळ पडावी, पण मधाचा मागमूसही नाही तिच्यात. उलट जी पांढरट भुकटी* केवड्यावर असते त्याला कवि धुळीची उपमा देतो. आणि भुंग्याला उपदेश करतो की, 'हे भुंग्या तू या केतकीच्या सुगंधाला भुलू नकोस. इथे तुझा कार्यभाग तर साधला जाणार नाहीच, उलट तुझं तोंडच धुलिमय होईल!' या ठिकाणी केतकीच्या रूपकातून गुणी पण गर्विष्ठ, कद्रू स्वभावाच्या मनुष्याचे चित्रण केले आहे. ज्याप्रमाणे केतकीकडे सुगंध मुबलक आहे त्याचप्रमाणे एखाद्याकडे एखादा गुण जरी मुबलक असला, तरी त्याच्याकडे औदार्य असल्याशिवाय त्या गुणांना शोभा येत नाही. अमक्याकडे मुबलक धन आहे पण त्या धनाचा त्याला गर्व झाला आहे, अशा माणसाकडे मदत मागण्यास आलेल्या गरजूंना त्याच्याकडून काही मिळणार नाहीच उलट त्यांचा अपमान होऊ शकतो. तर अशा मनुष्याच्या श्रीमंतीची महती का बरं वर्णावी? तसेच एखादा मनुष्य विद्वान आहे पण त्याने त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने काही शिकण्यासाठी आलेल्याला आपले ज्ञान दिलेच नाही तर अशा ज्ञानाचा तरी काय उपयोग? तर नुसते गुण असून भागत नाही तर गरजूंना त्या गुणांचा फायदा होत नसेल तर त्या गुणांना शोभा येत नाही. तेव्हा सामान्य मनुष्याला भुंग्याची उपमा देऊन कवि म्हणतो, "अरे भाबड्या, अशा गुणी पण गर्विष्ठ, कद्रू मनुष्यांपासून दूर राहा रे बाबा. तू ज्या इच्छेने त्याच्याकडे चालला आहेस ती पुरी व्हायची नाहीच, पण तूच पोळून निघशील."
खरंच 'औदार्याशिवाय गुणांना शोभा नाही' हे किती समर्पकपणे भुंगा आणि केवड्याच्या उदाहरणातून सांगितले आहे.

*त्या पांढरट भुकटीला काय म्हणतात ते मला ठाऊक नाही.

अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम्।
अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयोः समा॥

या सुभाषितात फुलांचं अतिशय सुरेख उदाहरण देवून संतांच्या 'सर्वे मानवा: समा:' या भावाचं चित्रण केलं आहे. पुन्हा, आधी सुलभ भाषांतर करून घेऊ. 'अञ्जलिस्थानि पुष्पाणि' - ओंजळीत असलेली फुले, 'वासयन्ति करद्वयम्' - दोन्ही हातांना सुगंधित करतात. 'अहो सुमनसां प्रीति:' - फुलांचं प्रेम, 'वामदक्षिणयो: समा' - डाव्या आणि उजव्या, दोन्ही हातांवर सारखंच असतं. किती सुरेख उदाहरण आहे. ओंजळीत फुलं धरली तर त्यांचा गंध दोन्ही हातांना लाभतो. फुले काही 'डावा-उजवा' असा भेद करत नाहीत, ती दोन्ही हातांना सारखीच सुगंधित करतात. येथे 'सुमनसां' या शब्दावर श्लेष आहे. सुमन म्हणजे अर्थात फूल तर 'सुमनसां' म्हणजे षष्ठी बहुवचन - फुलांचे/च्या/ची. तर दुसरा अर्थ आहे 'सु-मनसां' म्हणजेच चांगल्या मनाच्या माणसांचे/च्या/ची, अर्थात संतसज्जनांचे. अशाप्रकारे संतांना फुलांची उपमा देऊन त्यांच्या मनात असलेल्या 'सर्वजण सारखेच' या भावाचे येथे चित्रण केले आहे. येथे 'वाम' हे दुर्जनांचे तर 'दक्षिण' हे सुजनांचे रूपक आहे. संतजन डावा-उजवा असा भेदभाव करत नाहीत तर त्यांचे सज्जनांवर आणि दुर्जनांवरदेखील सारखेच प्रेम असते.

रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतां
अम्भोदा: बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा:।
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:॥

चातकाला केलेला हा उपदेश माणसांनाही तंतोतंत लागू होतो. आधी भाषांतर करू. 'रे रे मित्र चातक, क्षणं सावधानमनसा श्रूयतां' - अरे मित्रा चातका, क्षणभर सावधपणे ऐक. 'अम्भोदा: बहवो हि सन्ति गगने' - आकाशात ढग बरेच आहेत. 'सर्वेऽपि नैतादृशा' - पण सगळेच काही सारखे नाहीत. 'केचिद् वृष्टिभि: आर्द्रयन्ति धरणीं' - त्यातील काहीच ढग पावसाने जमीन भिजवतात, 'गर्जन्ति केचिद् वृथा' - तर काही उगीच गर्जना करतात. 'यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो' - ज्याला ज्याला पाहतोस त्याच्या पुढ्यात, 'मा ब्रूहि दीनं वचः' - दीनस्वरात याचना करू नकोस. इथं कवी चातकाला उपदेश करत आहे की प्रत्येक ढगासमोर पाण्यासाठी याचना करू नकोस सगळेच काही खरेच बरसणारे नाहीत. येथे मनुष्याला चातकाचे रूपक योजून कवि उपदेश करत आहे, की 'अरे मित्रा, या समाजात तुला मदत करणारी माणसं कोण आणि उगीच वल्गना करणारी माणसं कोण ते नीट ओळख. उगाच ज्याच्या त्याच्या समोर दीनवाणा होऊन हात पसरू नकोस.'

विधिरेव विशेष गर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध:।
सहकारतरौ चकार यस्ते सहवासं सरलेन कोकिलेन॥

कावळा आणि कोकिळपक्ष्याच्या उदाहरणातून मनुष्याला उपदेश. कावळ्या, सुरेल आवाजाच्या कोकिळपक्ष्याबरोबर तू आंब्याच्या झाडावर सहवास केलेला आहेस, (तरी) तू (वाईट आवाजातच) ओरड (रेक), (यात) तुझा अपराध काय? 'विधि: एव विशेष गर्हणीयः' - याला नियतीच पूर्णपणे कारणीभूत आहे. हे कावळ्याला उद्देशून केलेलं थोडंसं उपहासात्मक वचन असलं तरी मनुष्याला केलेला हा उपदेश आहे की जर एखादा गुण किंवा कला मुळातच तुमच्या अंगी नसेल तर ज्याच्याकडे ती कला आहे त्याच्या केवळ सहवासाने काही ती कला साध्य होत नाही.

आता आपण पाहू 'प्रहेलिका' हा काव्यप्रकार, अर्थात पहेली किंवा कोडी. कधीकधी साधी कोडी असतात, ज्यात प्रस्तुत स्वभाव अथवा गुणधर्मावरून ती गोष्ट कोणती हे ओळखायचे असते किंवा कधी कधी प्रहेलिकेतच उत्तर दडलेले असते. काही काही प्रहेलिका फसव्या असतात. वरकरणी दिसणार्‍या अर्थातून काहीच निष्पन्न होत नाही मात्र एक गूढ अर्थ त्यात दडलेला असतो जो उत्तराकडे निर्देश करतो. एक अत्यंत उत्कृष्ट प्रहेलिका पुढीलप्रमाणे :

य एवादि: स एवान्तः मध्ये भवतिमध्यमा।
य एतन्नाभिजानाति तृणमात्रं न वेत्ति सः॥

सर्वप्रथम नेहमीप्रमाणे सुलभ भाषांतर करू. 'य एव आदि: स एव अन्तः' - जो प्रारंभ आहे तोच अंतदेखील आहे, 'मध्ये भवतिमध्यमा' - मध्ये मध्यम आहे. 'य एतद् न अभिजानाति' - जो हेदेखील जाणत नाही, 'तृणमात्रं न वेत्ति सः' - त्याला काडीचीही जाण नाही. या भाषांतराप्रमाणे या कोड्याचं उत्तर एखादा 'देव' असं देईल. वरकरणी तसंच वाटतं देखील. पण हे अत्यंत फसवं भाषांतर आहे. वास्तविक या कोड्याचं उत्तर कोड्यातच दडलेलं आहे. पहिल्या ओळीचं नीट विचार करून भाषांतर केल्यास उत्तर पटकन कळून येईल. 'य एव आदि: - सुरूवात 'य' ने होते, 'स एव अन्तः' - आणि शेवट 'स' ने होतो, 'मध्ये भवतिमध्यमा' - मध्ये 'भवति'ची मध्यमा - अर्थात 'व' आहे. आता कळलं उत्तर? 'यवस' अर्थात गवत! पुढल्या ओळीत उत्तर दिलेलं आहे हे लक्षात आलं असेलच!

हे होतं प्रहेलिकेचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण! आता कोडी म्हटल्यावर कोडी घालणार्‍यानेच उत्तर दिलं तर कसं चालेल. थोडा तुम्हीही आस्वाद घ्या प्रहेलिकांचा. तेव्हा प्रस्तुत आहे एक प्रहेलिका..

अपदो दूरगामी च साक्षरो न च पण्डितः।
अमुखः स्फुटवक्ता च यो जानाति स पण्डितः॥

प्रहेलिका अशी आहे - 'अपदो दूरगामी च' - पाय नाहीत पण दूरपर्यंत जाणारा आहे, 'साक्षरो न च पण्डितः' - साक्षर आहे पण पंडित नाही, 'अमुखः स्फुटवक्ता च' - तोंड नाही पण स्फुटवक्ता आहे, 'यो जानाति स पण्डितः' - जो हे जाणतो तो विद्वान!

याचं उत्तर देता येईल? माझ्या मते फारच प्रसिद्ध प्रहेलिका असल्याने फार जड जाऊ नये.
तरीसुद्धा एक सल्ला : इथे 'साक्षर' हा शब्द येथे 'अक्षरासह' असा अभिप्रेत असू शकतो. Smile

उत्तर : पत्र/खलिता/व्यनि. बरोबर उत्तर देणार्‍या श्री. नंदन यांस 'पण्डित' किताब जाहीर! Wink

(मिपा/मीम वर पूर्वप्रकाशित)

No comments:

Post a Comment